गृहमंत्रालयाला कोण चालवत आहे? अनिल देशमुख की अनिल परब?
नागपूर: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या लेटर बॉम्ब नंतर राजकारण ढवळून निघाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावी अशी मागणी केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेवून सरकारवर काही गंभीर आरोप केले आहेत. तसेच पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
यावेळी फडणवीस म्हणाले, गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय, याची चौकशी होऊच शकत नाही. गृहखाते कोण चालविते? अनिल देशमुख की अनिल परब? कारण, सभागृहात गृहविभागावर उत्तरं सभागृहात अनिल परब देतात. या नियुक्त्यांमध्ये नेमका हस्तक्षेप कुणाचा, हे स्पष्ट झाले पाहिजे.
सचिन वाझे जितक्या गाड्या वापरत होते, त्यापैकी काही गाड्या नेमके कोण-कोण व्यक्ती वापरत होते, याची माहिती मिळायला हवी. एनआयए किंवा अन्य तपास यंत्रणांनी याची माहिती जनतेला दिली पाहिजे.
ज्युलिओ रिबेरो हे अनुभवी आणि अतिशय चांगली व्यक्ती आहेत. पण, शरद पवार यांनी सूचविल्याप्रमाणे ते केवळ परमवीरसिंग यांचीच चौकशी करणार की गृहमंत्र्यांची सुद्धा?
थोडक्यात विद्यमान गृहमंत्र्यांची चौकशी १५-२० वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलिस अधिकार्यांनी करावी, असे शरद पवार यांना सूचवायचे आहे का. असा सवाल सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला.
अनिल देशमुख यांचा राजीनामा आलाच पाहिजे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. याची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीत झाली पाहिजे. त्यांचा राजीनामा आल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे आंदोलन थांबणार नाही.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी काल एक पत्र लिहिले आहे. पण, अशाप्रकारचे हे पहिले पत्र नाही. यापूर्वी तत्कालिन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी एक अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. तेव्हाच्या आयुक्त, गुप्तवार्ता यांच्याकडून हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता आणि त्यांच्याकडून तो गृहमंत्र्यांकडे गेला. मुळात सुबोध जयस्वाल यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी पोलिस महासंचालकासारखे प्रतिष्ठेचे पद सोडण्याचे कारणच हे होते, कारण भ्रष्टाचाराबाबत शासन गंभीर नव्हते. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अधीन राहून काही फोन सर्व्हिलन्सवर होते. त्यातून जितके गंभीर प्रकार पुढे आले, ते फारच स्फोटक आहेत. बदल्यांचे एक मोठे रॅकेट आढळून आले. सुबोध जयस्वाल यांची तर बदली होणार नव्हती, ते या भ्रष्ट कारभाराला कंटाळून केंद्रात गेल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
परमवीर सिंग यांच्या अध्यक्षतेतील कमिटीने वाझे यांना नोकरीत घेतले. पण, मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या निर्देशाने, आशीर्वादाने त्यांनी हे काम केले, हे सांगायला शरद पवार विसरले. परमवीरसिंग यांच्या पत्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांना माहिती दिल्याचे (ब्रिफिंग) सांगितले आहे. मग यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का बोलत नाहीत? परमवीरसिंग यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करणार असाल तर ते पापांवर पांघरूण घालण्यासारखे होईल असे ते यावेळी म्हणाले