गावकऱ्यांचा दंड उदयनराजेंनी कोर्टात भरला; ठोंबरेनी मांडली कोर्टात बाजू

सातारा: राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाबत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधामध्ये सभा, मेळावे, आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. राज्यात धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असतानाही साताऱ्यातील बावधनमध्ये बगाड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. बावधानातील तब्बल १०४ गावकऱ्यांविरोधात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील ८३ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेनी विशेष प्रयत्न केले. दरम्यान भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी या सर्व गावकऱ्यांची जामीनाची रक्कम भरून त्यांना दिलासा दिला आहे.
शासकीय नियमांना झुगारुन लावत बावधनमधील नागरिकांनी बगाड यात्रा उत्साहात साजरी केली होती. हजारो भाविकांनी या यात्रेला उपस्थिती लावली होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेचं लौकिक आहे. भाविकांची मोठी श्रद्धा असली तरी या गर्दीमध्ये कोरोना नियमांचे पालन करण्यात आले नव्हते.
बावधन (ता. वाई) येथील १०४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर ८३ जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी वाई पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. शुक्रवारी मध्यरात्री अटक करण्यात आलेल्या ८३ जणांना न्यायालयाने त्यांना जामिनदार उपलब्ध नसल्याने त्यांना दंडाची रक्कम भरायला सांगितली. मात्र, दंडाची रक्कम एवढ्या रात्री आणायची कुठून हा प्रश्न गावकऱ्यासमोर उभा राहिला होता. उदयनराजे भोसले यांना याबाबत माहिती कळाली. त्यानंतर त्यांनी सर्व गावकऱ्यांच्या दंडाची रक्कम भरली. न्यायालयात गावकऱ्यांची बाजू अॅड. विजयसिंह ठोंबरे, दिग्विजय ठोंबरे यांनी बाजू मांडली.
काय आहे प्रकरण?
बावधन येथील भैरवनाथाची बगाड यात्रा दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी होते. यावेळी गावामध्ये करोना बाधितांची संख्या वाढत असल्याने व यात्रेच्या अनुषंगाने गर्दी वाढू नये म्हणून गाव संपूर्ण गाव परिसर प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेला होता. मागील आठ दिवसापासून गावातील सर्व व्यवहार बंद होते. बगाड यात्रा होऊ नये यासाठी प्रांताअधिकारी संगीता चौगुले राजापूरकर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जानवे खराडे, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, तहसीलदार रणजीत भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर आदींनी गावामध्ये अनेक बैठका घेऊन ग्रामस्थांनी कोरोना काळामध्ये यात्रेला घातलेल्या बंदीबाबत जनजागृती करत बगाड यात्रा करू नये असे आवाहन केले होते. संपूर्ण राज्यात बावधनची भैरवनाथ बगाड मोठी व एकमेव यात्रा म्हणून ओळखली जाते. मात्र आज अचानक पहाटे अचानक ग्रामस्थांनी बगाड रथ बांधून कृष्णा तीरावरून वाजत गाजत गावात आणला.