केंद्र-राज्य सरकार मध्ये सुसंवाद नसल्याने प्रकल्प रखडले
पुणे: नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. २३१ किलोमीटरचे काम लवकर सुरु करावे. पुण्यातून लांब पल्ल्याच्या रेल्वेची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी लोकसभेत सांगितले. रेल्वे अर्थसंकल्पावर लोकसभेत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान खासदार गिरीश बापट यांनी पुणे विभागातील समस्या मांडल्या.
यावेळी बापट म्हणाले, मुंबई-पुणे-नाशिक ही तीन औद्योगिक शहरे रेल्वेने जोडण्याबाबत बरीच वर्ष चर्चा सुरु आहे. त्यापैकी पुणे-नाशिक मार्ग हाय स्पीड रेल्वेने जोडण्यास राज्याकडून हिरवा कंदिल दिला आहे. यामुळे रेल्वे मंत्रालयाने हे काम तातडीने सुरु करावे अशी मागणी पुणेकरांची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच अनेक प्रकल्प भूसंपादन न झाल्याने रखडले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुसंवाद व सुसूत्रता नसल्याने राज्यातील अनेक प्रकल्प रखडले आहेत. विशेषत पुणे-मिरज-लोंढा हा ४६७ किलोमीटरचा मार्ग २०१५-२०१७ या वर्षात मंजूर झाला आहे. मात्र, भूसंपादन न झाल्याने हा प्रकल्प रखडला आहे. पुणे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक व आय टी हब आहे म्हणून पुण्यावरून अन्य राज्यात रेल्वेचे जाले निर्माण करण्याचा विचार रेल्वे खात्याने करावे अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली. किसान रेल्वे मुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. रेल्वे योजनेतून आता पर्यंत २७ हजार तन कृषी उत्पादन वाहतूक करण्यात आली आहे. या रेल्वेमुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. देशभरातील शेतकरी कुठेही आपला माल पोचवू शकतात असेही गिरीश बापट यांनी सांगितले.