मी सरकारला पत्रं दिलं आहे, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा – भाई जगताप

मुंबई : भाई जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर पोलिसांना धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना धमकी देण्याचा प्रयत्न केला होता. मी स्वत: जाऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटून मी त्यांना ही मागणी केली होती. फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. सरकार तात्काळ ही कारवाई करेल अशी आशा आहे, असं ते म्हणाले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यासाठी मी सरकारला पत्रं दिलं आहे. त्याला आठ दिवस उलटले तरी अद्यापही निर्णय घेण्यात आला नाही, अशी खंत जगताप यांनी व्यक्त केली.
मुंबई पोलिसांना धमकावल्या प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर भादंवि कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नियुक्त करावी, अशी मागणी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना भेटून ही मागणी केल्याचंही भाई जगताप यांनी सांगितलं.
सचिन वाझेंच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल होऊ शकतो, तर मी बीकेसी प्रकरणी स्वतः जाऊन पत्र दिलं आहे, मग राज्य सरकार गुन्हा का दाखल करत नाही, असा सवाल त्यांनी केला. बीकेसी पोलीस ठाण्यात रात्रीच्यावेळी एका व्यापाऱ्याला वाचवण्यासाठी राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते पोहचले होते. याप्रकरणी ते त्या व्यापाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत एसआयटी नेमावी अशी मागणी मी राज्याच्या गृहमंत्र्यांना एक आठवड्यापूर्वी पत्र लिहून केली होती. परंतु अद्याप काहीच झालं नाही. सचिन वाझे या गुन्हेगारांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल होतो मग मी पत्र देऊन देखील देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि उपस्थित आमदारांवर गुन्हा दाखल का होत नाही. असा सवालही त्यांनी भाई जगतापांनी यावेळी केलाय.