तब्बल ३०० कोटी रुपयांचा हेरॉईनचा साठा जप्त; ८ पाकिस्तानी नागरिकांना अटक

नवी दिल्ली: गुजरात एटीएस आणि भारतीय कोस्ट गार्डने गुरुवारी गुजरातमधील कच्छ जिल्ह्याच्या किनारपट्टीभागात एक मोठी कारवाई केली आहे. सममुद्रातील एका बोटीवर कारवाई करत ३० किलोग्रॅम हेरॉईनचा साठा जप्त केला आहे. या बोटीवर आठ पाकिस्तानी नागरिक उपस्थित होते. या आठही जणांना अटक करण्यात आली आहे. कोस्ट गार्डने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवारी भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सागरी सीमेपलीकडे असलेल्या पाकिस्तानी नौकेद्वारे अमली पदार्थ्यांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
कोस्ट गार्डने आपल्या निवेदनात पुढे म्हटलं, अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तटरक्षक दलाने गुजरात एटीएस सोबत संयुक्त कारवाई केली. बुधवारी रात्री पाकिस्तानी नौका भारताच्या सागरी हद्दीत आल्यावर तटरक्षक दलाने या नौकेला घेरलं. यानंतर तपासणी केली असता तेथून ३० किलो हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला आहे. या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत ३०० कोटी रुपये इतकी आहे.
प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली आहे की, नौकेच्या माध्यमातून पाकिस्तानातून गुजरातमध्ये अमली पदार्थांची तस्करी होत होती. ही नौका, हेरॉईनचा साठा आणि नौकेवर उपस्थित असलेल्या ८ पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आले आहे. या सर्वांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
तटरक्षक दलाने गेल्या वर्षभरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. तटरक्षक दलाने वर्षभरात जवळपास ५,२०० कोटी रुपये किंमत असलेला १.६ टनहून अधिकचा अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे.
अमली पदार्थाची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसात अशाच प्रकारे गुजरात एटीएस आणि कोस्ट गार्डने ऑपरेशन्स पार पाडत कारवाई केली आहे.
In a joint operation with ATS Gujarat, a Pakistani boat ‘NUH’ has been apprehended by Indian Coast Guard off Jakhau, Gujarat on the intervening night of 14-15 April 21 with 30 Kgs of Heroin. 8 Pakistani nationals have also been arrested from the boat: Indian Coast Guard (ICG) pic.twitter.com/h5j7gbpqpN
— ANI (@ANI) April 15, 2021