नगरमध्ये ऑक्सिजन न मिळाल्याने सात रुग्णांचा मृत्यू, जिल्ह्यात खळबळ

अहमदनगर : जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या त्यासाठी लागणारे ऑक्सिजन ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. रुग्णालयात ऑक्सिजन बेडची कमी असून त्यासाठी रुग्णांना व नातेवाईकांना नाहक त्राह सहन करावा लागत आहे. असे असताना आज एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. नगर येथिल एका खासगी रुग्णांलयामध्ये कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असताना या रुग्णांना पुरेसे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामधून प्रशासकिय स्तरावर ऑक्सिजनचे कोणतेही नियोजन होत नसल्याचे चित्र नगर मध्ये दिसून येत आहे.
कोरोना काळात जिल्ह्यात रोज ६० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मात्र सोमवारी २० मेट्रिक टन तर मंगळवारी ५० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाले आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याकारणाने ऑक्सिजन अपुरे पडताना दिसून येत आहे. तसेच उपलब्ध ऑक्सिजनचे वाटप न्यायपद्धतीने होत नसल्याने अनेक रुग्णालयांना पुरवठा होत नसल्याने ऑक्सिजन अभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत असल्याची चर्चा समोर येत आहे.