‘हिंसाचाराला खतपाणी पश्चिम बंगालमधून की बाहेरून हे पडताळून पाहावे’, संजय राऊतांची हिंसाचारावर पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पश्चिम बंगालच्या निवडणूका प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. सत्ताधारी ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसला हरवण्यासाठी भाजपने खूप मेहनत घेतलीये. त्यांचं कौतुक केलं पाहिजे अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसापूर्वी प्रतिक्रिया दिली होती. शिवाय सर्व केंद्रीय मंत्री, यंत्रणा ममताजींच्या विरोधात भाजपने पणाला लावली आहे परंतु तरीही तृणमुलची सत्ता पश्चिम बंगालमधून जाणार नाही. तामिळनाडू, पुदुच्चेरी वगळता कुठेही सत्तांतर होणार नाही असा विश्वास देखील शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला होता.
निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने मिळवलेल्या जबरदस्त विजयानंतर पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार सुरु असून भाजपा तसंच इतर पक्षांनी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. हिंसाचारात ११ जणांचा मृत्यू झाला असून केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधी सविस्तर अहवाल मागवला आहे, तर भाजपानेही देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापल्याचं पहायला मिळत आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडू लागले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हिंसाचार रोखणं ही सत्तेत असणाऱ्या पक्षाची जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरु असल्याचा बातम्या फार चिंताजनक आणि दु:खद आहेत. दुर्दैवाने पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास हा नेहमीच रक्तरंजित आणि हिंसाचाराने भरलेला आहे. जनतेने ममता बॅनर्जी यांना जोरदार बहुमत दिलं आहे. पश्चिम बंगालचा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. देशातील जनतेच्या मनातील प्रतिक्रिया तिथे उमटली आहे.” असं राऊत म्हणाले आहेत.
“दोन्ही बाजूंनी संयम राखणं गरजेचं आहे. विशेषत: जो पक्ष सत्तेत असतो त्यांचं हे काम असतं. पण टाळी एका हाताने वाजत नसते. देशाची स्थिती ही अत्यंत गंभीर आहे.सगळ्यांनी निवडणुकांमधील मतभेद-वाद मिटवून करोनाविरोधात लढण्याची गरज असताना सुद्धा हे का होत आहे याचा विचार दोन्ही बाजूंनी करायला हवा. एकमेकांना धमक्या इशारे देणे थांबवायला पाहिजे”. “हिंसाचार घडवण्यात खतपाणी घालणारे हे पश्चिम बंगालमधील आहेत की बाहेरून कोणी याला उत्तेजन देत आहे हे देखील पाहायला हवं,” असंही संजय राऊत म्हणाले.