रेमडेसिवीर, लस पुरवठा वाढवा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोविड संसर्ग रोखण्यावर लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय म्हणून सांगितला. महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने असे कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे, मात्र आम्ही अर्थचक्राला झळ बसू नये याची देखील काळजी घेत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कोविडसंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारा आयोजित या बैठकीत देशातील सर्वात जास्त कोविड संसर्ग फैलावलेल्या इतर राज्यांचेही मुख्यमंत्री सहभागी झाले होते.
रेमडेसिवीर, लस पुरवठा वाढवावा
महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठाही आवश्यक आहे. ऑक्सिजन विमानाने आणणे शक्य नसल्यास वेळ वाचविण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लॅंट्सच्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरून इतर मार्गाने महाराष्ट्राला मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने त्यांना संसर्ग थोपवता आलेला आहे. आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता त्यामुळेच इतर देशांतून उत्पादन होत असलेल्या लसी आम्ही आयात करून लसीकरण अधिक गतीने वाढवू शकतो का यावर मार्गदर्शन करावे.
रेमडेसिवीर किती उपयुक्त आहे ते सांगता येत नाही पण रुग्णांचा रुग्णालयांतील कालावधी निश्चितपणे कमी करत आहे. त्यादृष्टीने राज्याला रुग्ण संख्येनुसार पुरेसा पुरवठा व्हावा असेही मुख्यमंत्री म्हणाले.
विषाणूच्या दुहेरी उत्परिवर्तनाचा अभ्यास आवश्यक
राज्यात विषाणूचे दुहेरी उत्परिवर्तन आढळल्याने संसर्गातही झपाट्याने वाढ झाली यासंदर्भात पुढील वाटचालीसाठी याबाबत योग्य तो अभ्यास व्हावा तसेच जिनोम सिक्वेन्सिंग करावे जेणेकरून योग्य ते धोरण ठरवता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.