बाहेर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना पाळावा लागणार ‘हा’ नियम

मुंबई : देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारने राज्यासाठी आणखी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बाहेर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना आता ४८ तासांच्या आत RTPCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे बंधनकारक केले आहे.
राज्य सरकारने गोवा, उत्तराखंड, गुजरात, केरळ, दिल्ली NCR आणि राजस्थान या राज्यांना कोविड १९ संसर्ग संदर्भात संवेदनशील जाहीर केले आहे. त्यामुळे या सर्व ६ राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आता ४८ तासांच्या आत RTPCR चाचणी करणं बंधनकार करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे.
ज्या प्रवाशांची RTPCR चाचणी निगेटीव्ह आली असेल त्यांनाच राज्यात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने अधिसूचना काढत जाहीर केले आहे.जे प्रवाशी ४८ तासाच्या आतील RTPCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आणणार नसतील त्यांची रेल्वे प्लॅटफॉर्मवरच ॲन्टीजेन चाचणी करण्याचे आदेश राज्य सरकारने रेल्वेला दिले आहेत. रेल्वेने या ६ संवेदनशील राज्यातून महाराष्ट्रात निघणाऱ्या एक्स्प्रेसची आणि त्यातल्या प्रवाशांची सर्व माहिती ४ तास आधी राज्यसरकारला कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रवासी महाराष्ट्रातील कुठल्या रेल्वे स्थानकावर उतरणार याचीही माहिती रेल्वेने राज्य सरकारला द्यायची आहे.
रेल्वेने आरक्षित तिकीट असणाऱ्यांना प्रवासाची परवानगी द्यावी. रेल्वेने फक्तं आरक्षित तिकीटंच वितरीत करावी. आरक्षित तिकीट नसणाऱ्यांना प्रवास करू देऊ नका, असे आदेश राज्य सरकारने अधिसूचना काढत रेल्वे प्रशासनाला दिले आहे.