कोरोना विषाणूवर मात हीच आता आरोग्याची गुढी – मुख्यमंत्री

मुंबई: कोरोना विषाणूवर मात हीच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळावी, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज साजरा होणाऱ्या गुढी पाडव्याच्या आणि मराठी नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट गरजेची आहे. आरोग्य सेवक, परिचारीका, डॉक्टर्स यांच्यासह विविध यंत्रणातील कोविडयोद्धे अहोरात्र राबत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना साथ म्हणून गुढी पाडव्याच्या सणादिवशीही आपण घरीच थांबूया. नेहमीच्या प्रथा-परंपरांना थोडं बाजूला ठेवून एकमेकांना शुभेच्छा देऊन सण साजरा करुया. गर्दी नकोच, मास्क अनिवार्य आणि वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीतून कोरोनावर मात करणे ही आरोग्याची गुढी यावर्षी महत्वाची आहे. यातून येणारे नववर्ष आपल्या सर्वांसाठी आरोग्यदायी, सुख-समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल, असा विश्वास आहे. या आरोग्यदायी गुढीसाठी आणि मराठी नववर्ष प्रारंभाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा.
कोरोना विषाणूवर मात हीच आरोग्याची गुढी! गर्दी टाळणे,मास्कचा वापर व वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुढी पाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा देताना केले आहे. हे नववर्ष आपल्या सर्वांसाठी आरोग्य, सुख-समृद्धी, भरभराट घेऊन येवो.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 13, 2021
राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून शुभेच्छा
गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच संपूर्ण देश, विशेषतः महाराष्ट्र, करोनाच्या गंभीर संकटातून जात आहे. त्यामुळे गुढी पाडव्याचा मंगल सण यंदा आपापल्या घरीच अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. हा सण तसेच आगामी नवे वर्ष सर्वांकरिता सुख, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो अशा सर्वांना शुभेच्छा देतो. युगादी, चेती चाँद, बैसाखी तसेच सौसर पाडवो निमित्ताने देखील मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.