नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करणार!

मुंबई: राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा पास करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पण, आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरसकट पास करण्यात येईल, याबद्दल लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.
शालेय शिक्षण विभागाने कोरोना परिस्थितीमुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा पास करून पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थींना सरसकट उत्तीर्ण करणार आहे. त्यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शिक्षण विभागाचा निर्णय घेणार आहे.
परंतु, दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही याबाबत येत्या एक – दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
३ एप्रिल रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून घोषणा केली होती. कोविड १९ ची परिस्थिती पाहता इ. १ ली ते इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तिचा शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार सरसकट वर्गोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असं गायकवाड यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे इ. ९ वी आणि इ. ११ वीच्या विषयीसंबंधी निर्णय लवकरच घेण्यात येईल, असं संकेतही त्यावेळी गायकवाड यांनी दिले होते. त्यामुळे लवकरच हा निर्णय जाहीर केला जाणार आहे.