भारतात लॉकडाऊन आवश्यक? WHO चं महत्त्वाचं विधान

नवी दिल्ली: सध्या भारतात कोरोना स्थिती भयानक होत चालली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अनेक लोकांना आपल्या विळख्यात ओढलं आहे. तसेचं कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट भारतासाठी चितेंचा विषय ठरत आहे. अशातचं देशांत अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात कडक निर्बंध लादले जात आहेत. तसेच देशात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करायचा का? याबाबतही चाचपणी सुरू आहे. पण आता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) लॉकडाउनबाबत मोठं विधान केलं आहे. WHO च्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी लॉकडाऊनचे भयंकर परिणाम नागरिकांना भोगावे लागतील, असं म्हटलं आहे.
त्यांनी देशातील दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जनतेची भूमिका महत्त्वाची असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात लसीकरण देण्यात यावं, असंही त्यांनी म्हटलं आहे. इंग्रजी वृत्तपत्र ‘द इंडियन एक्स्प्रेस’ शी बोलताना डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या की, ‘पुरेशा लोकांना लस देईपर्यंत आपल्याला दुसर्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. या साथीच्या आजारात आणखीही बऱ्याच लाटा असू शकतात.’ त्याचबरोबर WHO ने कोविशिल्ड लशीच्या दोन डोस दरम्यान ८ ते १२ आठवड्यांचा कालावधी ठेवण्याची शिफारस केली आहे. यावर स्वामीनाथन म्हणाल्या की, ‘सध्या लहान मुलांना लस देण्याची सल्ला देण्यात आला नाही. पण दोन डोसमधील कालावधी ८ ते १२ आठवड्यांपर्यंत वाढवता येऊ शकतो.’
डब्ल्यूएचओच्या विभागीय संचालिका डॉ. पूनम खेत्रीपाल यांनीही लसीकरणावर भर दिला आहे. ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त बोलताना त्यांनी सांगितलं की, कोरोना संक्रमणाची नवीन लाट संपूर्ण देशात पसरत आहे. त्यामुळे लशीचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विशेष म्हणजे देशात दररोज सरासरी २६ लाख डोस दिले जात आहेत. याबाबतीत केवळ अमेरिकाच भारतापेक्षा पुढं आहे. तिथे दररोज सरासरी ३० लाख डोस दिले जात आहेत.