‘या’मुळे आम्ही अपयशी, पंढरपूर निकालावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण

मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना धोबीपछाड देत भाजपच्या समाधान अवताडे यांनी विजयाचा गुलाल उधळला. मात्र महाविकास आघाडीतून तीन पक्ष एकत्र लढत असतानाही दिवंगत आमदार भालक भालके यांच्या मुलाला पराभवाची चव का चाखावी लागली, याची आता चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मुंबईतील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या पराभवाच्या कारणांवर भाष्य केलं आहे.
‘पंढरपूरमध्ये झालेला पराभव महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे का?’ असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना पटोले म्हणाले की, ‘पंढरपूर पोटनिवडणुकीचे मुद्दे वेगळे होते. स्थानिक प्रश्नांवर ही निवडणूक लढली गेली. महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्याकडे असणाऱ्या विठ्ठल साखर कारखान्याबाबत लोकांना काही आक्षेप होते. अशा स्थानिक प्रश्नांमुळे आम्हाला अपयश आलं, ‘ असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावरील आरोप प्रत्यारोपावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भुजबळांना थेट इशाराच दिला. ‘तुम्ही निर्दोष होऊन बाहेर आलेला नाहीत, जामीनावर आहात…त्यामुळे सांभाळून बोला,’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले. या वादावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर बोलण्यापेक्षा केंद्रातील सरकारमध्ये आणि गृहखात्यात नेमकं काय चाललंय हे पाहावं,’ असा टोला नाना पटोले यांनी लगावला.