‘मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत’ म्हणत मनसेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई : देशात कोरोनाच्या महामारीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झालीये. पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर थैमान दुसऱ्या लाटेनं घातलं असून, देशात आणि राज्यात रुग्ण आणि नातेवाईकांबरोबर सर्वसामान्यांनाही हालअपेष्टा सोसोव्या लागत आहे. बेड, ऑक्सिजनअभावी रुग्णांचे जीव जात आहेत. तर दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्यांचे कडक निर्बंधांमुळे हाल होऊ लागले आहेत. तसंच या व्हायरसच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अर्थचक्रालाही मोठा धक्का बसला आहे. याच विदारक परिस्थितीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत देश आणि राज्यात नुसता गोंधळ सुरू असल्याचं अधोरेखित केलं आहे. “लसीकरण आहे, पण लस नाही. खाटा आहेत, पण ऑक्सिजन नाही. उपचार आहेत, पण औषध नाही. व्यापारी आहेत, पण व्यापार नाही. लोक आहेत, पण नोकरी नाही. मन की बात आहे, पण मनातलं नाही. मुख्यमंत्री आहेत, पण रस्त्यावर नाहीत. सगळंच रामभरोसे आहे, पण त्यात काहीच राम नाही,” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही