महाराष्ट्रात २३ लाख लसीचे डोस वापराविनाच पडून
दिल्ली: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांची भेट घेतली. राज्यात एक कोटी ७७ लाख लोकांना यामध्ये हेल्थ वर्कर, फ्रन्टलाईन वर्कस, ४५ वर्षावरील विविध आजारांनी ग्रस्त नागरिक यांना २ कोटी २० लाख लसीचे डोसेस पुढील तीन महिन्यात लागणार आहेत. सध्या रोज सव्वा लाख नागरिकांचं लसीकरण केलं जात आहे. मात्र आठवड्याला २० लाख डोसेसची गरज आहे. त्यावेगाने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस मिळावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. केंद्र सरकार नक्की मदत करेल, असा विश्वासही राजेश टोपे यांनी व्यक्त केला.
राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर लसीकरण हा पर्याय असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच लसीचे जास्तीचे डोस राज्यात पुरवले जावे अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केलीये. मात्र राज्याला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैकी ५६ टक्के डोस अद्यापही पडून असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलाय.
Maharashtra Government had only used 23 lakh vaccines out of the total 54 lakh vaccines sent to the state, till 12th March. 56% vaccines remained unused. Now, Shiv Sena MP asks for more vaccines for the state.
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) March 17, 2021
First mismanagement of pandemic now poor administration of vaccines.
प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करत म्हटलंय की, “महाराष्ट्रात १२ मार्चपर्यंत ५२ लाख लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. महाराष्ट्राला दिलेल्या ५४ लाख लसींपैकी केवळ २३ लाख लसींचाच वापर झाला आहे. म्हणजेच महाराष्ट्रात ५६ टक्के लसींचे डोस अजूनही पडून आहेत. आता शिवसेनेचे खासदार अधिकच्या लसीची मागणी करत आहेत. कोरोनाकाळात व्यवस्थेचा बोजवारा उडाला आणि लसीकरणासाठी योग्य व्यवस्थापन नसल्याचं दिसत आहे.”
प्रकाश जावडेकरांच्या ट्विटवर टीका करताना जयंत पाटील यांनी म्हटलं की, ‘लसींबाबतची माहिती माझ्याकडे नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना जास्त माहिती आहे. मात्र भारतीयांसाठी लसी कमी पडत असताना केंद्राला पाकिस्तान व इतर देशांची काळजी आहे. देशातील नागरिकांसाठी लसीचा तुटवडा असताना लस निर्यात करत पाकिस्तान व इतर देशांना जो दानशुरपणा आम्ही दाखवत आहोत त्याचे कौतुक करावे तितके थोडे आहे.’