‘प्रत्येकानं फॅमिली प्लानिंग केलं असतं तर…’ खासदार उदयनराजेंचं अजब विधान!

सातारा: करोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्यावरून राज्य व केंद्र सरकारमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्याला आवश्यकतेपेक्षा कमी लसीचा पुरवठा करण्यात येत आहे, असा आरोप महाविकास आघाडी सरकारनं केला आहे. तर, महाराष्ट्राचं नियोजन चुकल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. हे सगळं सुरू असताना भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी लसीच्या तुटवड्यासाठी वेगळंच कारण पुढं केलं आहे.
सातारा शहर व जिल्ह्यातील व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे यांची भेट घेऊन लॉकडाऊनमुळे होत असलेल्या अडचणींची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांना भेटून उदयनराजेंनी व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.राज्यात लसीचा तुटवडा निर्माण होण्यासाठी लोकसंख्या जबाबदार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. लस घ्यायला लोक तयार आहेत, पण लसीचे डोस उपलब्ध नाहीत त्याबद्दल तुमचं काय मत आहे, असं पत्रकारांनी उदयनराजेंना विचारलं असता त्यांनीच पत्रकारांना उलट प्रश्न केला, ‘प्रत्येकानं फॅमिली प्लानिंग केलं असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली असती का?,’ अशी विचारणा त्यांनी केली.
‘आपल्याला समजलं पाहिजे. युरोपातील किंवा अन्य देश बघा. त्यांची लोकसंख्या बघा. त्यांच्याकडं प्रत्येक गोष्टीचं एक नियोजन असतं. फॅमिली प्लानिंग असतं,’ असं उदयनराजे म्हणाले. लसीच्या पुरवठ्यावरून वाद निर्माण करण्यात अर्थ नाही. महाराष्ट्रालाच जास्त आणि दुसऱ्याला कमी का मिळावी? प्रत्येक राज्याला लस मिळाली पाहिजे एवढं मला कळतं,’ असं उदयनराजे म्हणाले.
शनिवार-रविवार विषाणू नसतो का?
‘लॉकडाऊनमुळे सातारा शहर व जिल्ह्यातील छोट्या मोठ्या व्यापारी वर्गाला होत असलेला त्रास अन्यायकारक आहे. मी व्यापारी असतो तर जग इकडचं तिकडं झालं असतं तरी मी दुकान बंद ठेवलं नसतं. दुकान बंद करून जगणार कसं? कर्ज कसं फेडणार? कामगारांचे पगार कुठून देणार? मुलाबाळांचं काय करणार?,’ असा सवाल उदयनराजेंनी केला. लॉकडाऊन हा काही उपाय नाही,’ असं ते म्हणाले. शनिवार-रविवार तुम्ही बंद ठेवणार. शनिवार-रविवार विषाणू नसतो का? तसं काही संशोधन असेल तर आम्हाला दाखवा, असा चिमटाही त्यांनी काढला.