सरकार हेडलाईन्स मॅनेजमेंट आणि स्वत:चीच पाठ थोपटवून घेण्यात व्यग्र – परकला प्रभाकर

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. दररोज तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होतोना दिसून येत आहे तर, तीन हजारांच्या आसपास कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होतांनाचे चित्र देशात दिसत आहे. या महामारीमुळे रुग्णांलयात बेड मिळेनासे झाले. ऑक्सिजन, औषधे, यासह इतर आरोग्यविषयक बाबींचा तुटवडा पडला असून यामुळे सुद्धा अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. मात्र सरकार ‘कोरोना संकटाच्या काळात लोकांना मदत करण्याऐवजी हेडलाईन्स मॅनेजमेंट आणि स्वत: चीच पाठ थोपटून घेण्यात व्यग्र आहे’ अशी टीका आज मोदी सरकारवर केली आहे. महत्वाची बाब हा घरचा आहेर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती अर्थतज्ज परकला प्रभाकर यांनी दिला आहे. प्रभाकर यांनी हे आपले मत एका अर्थविषयक ऑनलाईन चर्चेदरम्यान व्हिडिओव्दारे मांडले आहे. यावेळी त्यांनी ‘माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी अनेक रचनात्मक सूचना केल्या होत्या मात्र, या सूचनांवर सरकारमधील मंत्र्यांनी असभ्य प्रतिक्रिया दिली आणि राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला’ असेही प्रभाकर यांनी टिका करताना म्हटले आहे.
यावेळी आणखी बोलताना प्रभाकर असेही म्हणाले की, भारतात दररोज कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे देशात आपतकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी केंद्र सरकारने लोकांची मदत करायला हवी. मात्र केंद्र सरकार असे न करता हेडलाईन मॅनेजमेंट आणि स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त असल्याची टीका प्रभाकर यांनी केली आहे. तसेच केंद्र सरकार कोरोनाची खरी आकडेवारी लपवत असेल्याचाही आरोप प्रभाकर यांनी केला आहे. देशात आतापर्यंत कोरोना महामारीमुळे १.८० लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. मात्र सरकारकडून खरी आकडेवारी समोर येत नसल्याचे प्रभाकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान, कोरोना महामारी मुळे देशात इतरही समस्या निर्माण झाल्या आहे. यामध्ये काहींना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागत आहेत तर, कोरोनावर उपचार करण्यात काहींची जमा पुंजीही संपत चालली आहे. त्यामुळे या आर्थिक परिणामानंतर पुन्हा उभे राहणे कठीण होऊन बसले आहे. प्रभाकर यांच्या टीकेची सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे.