खुशखबर: पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पास करणार-वर्षा गायकवाड

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे जाळे अत्यंत वेगाने पसरताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच, इयत्ता नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या प्रकारे राज्यात कोरोनाची रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज मी इयत्ता पहिली ते आठवीचे वार्षिक मुल्यमापन संदर्भात मी बोलणार आहे. मधल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन यूट्यूब, गुगल इत्यादींच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवलं. खरंतर पहिली ते चौथीपर्यंत शाळा या वर्षात आपण शाळा सुरू करू शकलो नाही. पाचवी ते आठवीच्या शाळा आपण सुरू केल्या, परंतु काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, काही ठिकाणी सुरू होऊ शकल्या नाहीत. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी देखील त्यांचा अभ्यासक्रम त्या पूर्ण करू शकल्या नाहीत. परंतु आपण सातत्यपूर्ण हा प्रयत्न करत होतो, की मुलांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहचावं आणि मुलाचं शैक्षणिक नुकसान होऊ नये. सगळी परिस्थिती लक्षात घेता आम्ही शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून असा निर्णय घेत आहोत की, राज्यातील जे पहिली ते आठवी इयत्तेमधील विद्यार्थी आहेत, शिक्षण हक्क अधिकाऱाच्या अंतर्गत जे विद्यार्थी येतात, त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करून त्यांना पुढील इयत्तेत पाठवण्यात येत आहे. असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
📢 Announcement: In view of the ongoing situation due to #Covid 19, all state board students across Maharashtra state from Class 1st to Class 8th will be promoted to the next class without any examinations. A decision regarding students of class 9th and 11th will soon be taken. pic.twitter.com/3eA5hvQUG5
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 3, 2021