४५ वर्ष वयोगटावरील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळणार
नवी दिल्ली: आतापर्यंत केवळ सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोना लस दिली जात होती. येत्या एक एप्रिलपासून ४५ वर्ष वयोगटावरील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. ४५ वर्षांवरील प्रत्येकाने लसीकरणासाठी नोंदणी करावी, असं आवाहन जावडेकरांनी केलं. कोरोना महामारीची दुसरी लाट देशात जोर धरत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकार कोरोनापासून कसा बचाव करता येईल यावर पूर्ण लक्ष देत आहे. त्यासाठी लस हा सर्वात उत्तम मार्ग आहे.
४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. तसेच देशात लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून कोरोना लसीची कोणताही तुटवडा भासणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींचे सध्या लसीकरण करण्यात येत आहे. ४५ ते ५९ या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींचेही तूर्तास लसीकरण सुरु आहे. या दोन्ही वयोगटांतील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी १ जानेवारी २०२२ रोजीचे वय विचारात घेतले जात आहे. यानुसार आज ज्यांचे वय ५९ वर्षे ३ महिने किंवा सहव्याधी असणाऱ्या गटातील व्यक्तीचे वय ४४ वर्षे ३ महिने असले तरीही त्यांची लसीकरणासाठी नोंदणी करणे व नंतर लसीकरण करणे शक्य आहे.
It has been decided that from 1st April, the vaccine will open for everybody above 45 years of age. We request that all eligible should immediately register and get vaccinated: Union Minister Prakash Javadekar #COVID19 pic.twitter.com/RWoTORzYnW
— ANI (@ANI) March 23, 2021
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच देशात आतापर्यंत ४.७२ कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत एकूण ४,७२,०७,१३४ लोकांचं लसीकरण झालं आहे.
लसीकरणाचा फीडबॅक चांगला
इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार डॉ. हर्ष वर्धन यांनी राष्ट्रीय स्तरावर लसीकरणासंदर्भातील फीडबॅकबद्दल सांगितले की, “लसीकरणाचा फीडबॅक खूप चांगला आहे. आज सकाळपर्यंत ४.५ कोटी डोस दिले गेले आहेत. ७६ देशांना ६ कोटी डोस देखील दिले आहेत. त्यामुळे केवळ आपला भारतच नाही तर आपण संपूर्ण जगाला मदत करत आहोत. लस देण्याचे कामही जन आंदोलना सारखंच केले जात आहे. आता लसीबाबतची भीतीही कमी झाली आहे. आम्ही लोकांना लसीबाबत माहिती देण्यासाठी देखील एक मोहीम राबवत आहोत, असं हर्ष वर्धन यांनी सांगितलं