राज्यात विकेंड लॉकडाऊनचा निर्णय ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार

मुंबई : राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत राज्यात कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असं मलिक यांनी सांगितलं.
लोकांना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचीही जाणीव होईल. शिवाय मुंबई, पुण्यासारख्या शहरात होणाऱ्या नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण आणलं जाणार असल्याचंही या बैठकीत मांडण्यात आल्याचं मालिक यांनी सांगितलं. तसंच उद्या रात्री ८ वाजेपासून नियमावली लागू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीये.
काय काय बंद राहणार?
- शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ पर्यंत लॉकडाऊन
- लोकल ट्रेन सुरू राहणार
- जिम बंद होणार
- अत्यावश्यक सेवांना परवनगी
- रेस्टॉरंट, मॉल टेक अवे सर्व्हिस सुरु राहणार
- अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालण्याची परवानगी
- रात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
- धार्मिक स्थळांवर निर्बंध असतील
- सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत: बंद
- गार्डन, मैदाने बंद
- जिथे केसेस वाढतायेत तेथील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला
-सिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येनं करता येणार नाही
- रिक्षा- ड्रायव्हर + २ लोक
- बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल
- टॅक्सीत मास्क घालावा
- कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचना
- मंत्रालय, महत्वाचे ठिकाणी व्हिजिटर्स बंदी
- चित्रपट शूटिंगला परवानगी आहे, पण गर्दी करू नये, लढाई, आंदोलन असे सीन असतील त्या शूटिंगला बंदी
- बाजारपेठांमध्ये मर्यादित संख्येनं सोडलं जाईल
- शाळा कॉलेज बंद, इंडस्ट्री चालू राहतील
- प्रतिबंधित क्षेत्र तयार करा
- सोसायटीच्या बाहेर बोर्ड लावायचा अन्यथा दंड आकारणार
- २० लोकांना अंत्यविधींसाठी परवानगी
- लग्नसमारंभांबाबत लोकांची संख्या मर्यादित
- विमान प्रवासाबाबत कोणतेही बदल नाहीत मात्र, टेस्टिंग कडक करणार
गेल्या काही दिवसांपासून रोज ४० हजारांच्या वर रुग्ण समोर येत आहेत. आधीपासूनच राज्यातील पुण्यासह अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. आज लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली. २ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संवादात येत्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं.