भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबा
दिल्ली: केंद्र सरकारने आणलेल्या तीन नवीन कृषी कायद्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ मार्च रोजी ४ महिने पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्या बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचां पाठिंबा
२६ मार्च रोजीच्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेला असून जिल्हा, तालुका पातळीवर निर्धाराने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि अजितदादा पवार यांनी केले आहे.
‘संयुक्त किसान मोर्चा’ या बॅनरखाली देशातील ५०० पेक्षा जास्त संघटना एकत्र येऊन दिल्लीच्या सीमेवर शांततामय मार्गाने केंद्र सरकारने केलेलेकृषी कायदे रद्द करावे यासाठी आंदोलन करत आहेत. आतापर्यंतच्या या आंदोलनात जवळपास ३०० हून अधिक शेतकऱ्यांचे बळी गेलेले आहेत.
केंद्रातील भाजप सरकारने सार्वजनिक संपत्तीची विक्री करणारे जनविरोधी निर्णय घेतलेले आहेत. इंधन व गॅस सिलेंडरच्या झालेल्या प्रचंड दरवाढीने सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागले असा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. या सर्व बाबींना विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने २६ मार्च रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.