अनिल देशमुख यांचा राजीनामा, गृहमंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडेच राहणार.
मुंबई : परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये पोलिसांमार्फत वसुली करण्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी परबीर सिंग यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तसंच परमबीर सिंह यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांच्या जनहित याचिका तर डॉ. जयश्री पाटील यांची रिट याचिका या सर्व याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या आहेत. याचिकाकर्त्या डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करतांना असे म्हटले होते की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी.
या खटल्याची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, अनिल देशमुख हे गृहमंत्री असल्याने पोलिस या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात येते आहे.
एकीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या सीबीआय चौकशीला मुंबई हायकोर्टाने ग्रीन सिग्नल दिला आणि दुसरीकडे अडचणीत सापडलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. हायकोर्टाच्या आदेशामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. अखेर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी याबद्दल घोषणा केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयात पोहोचले आहे. त्याआधी शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि शरद पवारांची बैठक झाली. या बैठकीला सुप्रिया सुळे या सुद्धा हजर होत्या. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय ठरलं हे अद्याप गुलदस्त्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार होता. त्यानुसार, अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान गृहमंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडेच राहणार असल्याचं सांगितलं जातंय.