भारताची बदनामी करण्याचे आंतरराष्ट्रीय षडयंत्र

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताचे चित्र ज्या पद्धतीने तयार केले जात आहे. त्यावरून हे फार मोठं षडयंत्र असू शकत. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्यासाठी असे षडयंत्र रचले जाऊ शकते अशी शंका शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ही शंका उपस्थित केली. यावेळी ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय पातळीवर जर भारताची बदनामी होत असेल तर ही वेळ राजकारण करण्याची नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर सर्वांनी मतभेद विसरून आपण पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. मोदी जे धोरण बनवतील याच्या पाठीशी उभे राहायला हवे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर जर देशातील व्यक्तीचा किंवा देशाचा अपमान होत असेल तर ते योग्य नाही. विदेशी सोशल मीडिया, विदेशी मिडियात भारताचे चित्र ज्या पद्धतीने दाखविण्यात येत आहे. त्यातून भारताचे सामाजिक स्वास्थ आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे भारताला बदनाम करण्याचा हे षडयंत्र असू शकते. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्यासाठी हे षडयंत्र असू शकते. त्याविरोधात आपण एकत्र यायला हवं असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले.
मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोग बाबत व्यक्त केलेली भावना आम्ही अगोदर पासूनच मांडत होतो. देशात कोरोनाची परिस्थिती भयानक असताना निवडणुकांसाठी इतकी लोक एकत्र यायला नको होती. हे आम्ही सांगत होतो. तेच लोक देशभर गेल्याने फैलाव झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक गोष्टी गांभीर्याने घेतात. ते मद्रास उच्च न्यायालयाने गोष्टही गांभीर्याने घेतली असे त्यांनी यावेळी सांगितले.