जळगावमधील त्या घटनेची होणार चौकशी
अधिकाऱ्यांची समिती गठीत
मुंबई: आशादीप महिला वसतिगृहातील तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात असल्याचा किळसवाना प्रकार समोर आला आहे. जळगावच्या आशादीप महिला वसतिगृहातील प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
वसतीगृहातील महिला आणि मुलींना काही जणांनी नृत्य करायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलांनी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडे आपल्यावर अन्याय, अत्याचार केला जात असल्याची तक्रार केल्याने ही संपूर्ण घटना उघडकीस आली. रात्री काही तरुण पैसे घेऊन वसतिगृहात प्रवेश करून अनैतिक कृत्य करत असल्याचं या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. इंदूबाई बहुउद्देशीय संघटनेच्या अध्यक्षा मंगला सोनवणे आणि जनायक फाउंडेशनचे फिरोज पिंजारी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. या प्रकारात कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या सर्व प्रकारांचे पडसाद सभागृहात पाहायला मिळाले. भाजप आमदार श्वेता महाले यांनी यावर प्रश्न उपस्थित केला यावर कारवाई करण्याची मागणी केली.
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी याप्रकरणी सरकारला धारेवर धरलं. “इतका गंभीर प्रकार असताना अजूनही एफआयआर का दखल केला नाही? जळगावच्या जिल्हाधिकार्यांकडे तक्रार आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन प्रमाणे एखाद्या महिलेचे तक्रार आल्यास त्वरित त्याची दखल घेऊन एफआयआर दाखल झाला पाहिजे. महाराष्ट्र पोलीस खाते सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईनच्याही वर आहे का?”, असा सवाल त्यांनी माध्यमांशी बोलतांना केला.
घटनेची चौकशी करण्यासाठी चार उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या प्रकारांची दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अन्याय, अत्याचार झालेल्या महिला व मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था करण्यासाठी महिला व बालकल्याण विभाग यांच्यावतीने १९८३ मध्ये आशादीप महिला शासकीय वसतिगृहाची स्थापना जळगाव येथे झाली होती.