महाराष्ट्रासाठी 1 हजार 121 व्हेंटिलेटर येत्या तीन ते चार दिवसात येतील- प्रकाश जावडेकर

पुणे : करोनाची साख़ळी तोडण्यासाठी जे उपाय योजले जात आहेत त्याचे आपण पालन केले पाहीजे.
नागरिकांनी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. हा कालावधी कोरोना संसर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठीची बंधने पाळली जावीत. असे मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यातकेले. विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत’ आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी बोलताना होते. जावडेकर म्हणाले, चाचण्यांची क्षमता वाढविण्याची गरज असून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक संपर्क शोधून त्यांचे विलीगीकरण करणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या कामात स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. सर्व मिळून कोरोनाचा संसर्ग निश्चितपणे दूर करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रासाठी व्हेंटिलेटर मिळण्याबाबत आपण केंद्रातील संबंधित अधिकाऱ्याशी, मंत्र्यांशी बोलणे केले असून 1 हजार 121 व्हेंटिलेटर येत्या तीन ते चार दिवसात येतील . तसेच ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकार महाराषट्राला सहाय्य करणार आहे असे त्यांनी सांगितले.
करोना रुग्णांचे ट्रॅकिंग, टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करण्यासाठी जे मनुष्यबळ लागणारआहे त्यासाठी नॅशनल हेल्थ मिशन मधून निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्हयासाठी पुढील पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे सांगतानाच ट्रॅकिंग, टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करा. बेड व्यवस्थापन तसेच रेमडेसिवरबाबत कडक धोरण राबवा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीदिले. आरोग्य सुविधा वाढविण्यासोबतच हॉटस्पॉटमधील बंधने पाळली जातील याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आदी उपस्थित होते.